शिरुर : प्रतिनिधी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे शिरुर शहरात आयोजन करण्यात आले होते. शिरुर नगरपरिषदच्या नवीन इमारती पासून ही दौड सुरु झाली. दौड सुरु होण्यापूर्वी एकात्मते संदर्भात उपस्थितानी शपथ घेतली. ही दौड पाबळफाटा पुणे नगर रस्त्याने शिरुर बसस्थानक मार्गे शिरुर तहसिल कार्यालयापर्यत गेली .

या दौडीत शहरातील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, विविध शाळेचे विद्यार्थी सामाजिक व स्वयंसेवी संस्था याच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला.
नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, शिरुर नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, थिटे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अमोल शहा, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. ब्रिजेश तांबे, प्रा .डॉ व्यंकटेश केत, आरएमडी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु, शिरुर नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ, संतोष चव्हाण, मुख्याध्यापक मारुती कदम, वात्सल्य सिंधु फाउंडेशच्या उषा वाखारे, जनविकास फाउंडेशनचे तुषार वेताळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांनी सांगितले की स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आणि आझादी का अमृत महोत्सवाचा संदेश देशभरात पोहचवण्याच्या उद्देशाने देशभर युनिटी रनचे आयोजन आले असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी सरदार पटेल यांचे योगदान महत्वपुर्ण होते असे ही बर्गे यांनी सांगितले.
दौडीच्या मार्गावर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.






