टाळ वाजे, मृदंग वाजे, बाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात तर ” माऊली माऊली ” च्या निनादात तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर आळंदी ते पंढरपूर पायी लाखो वारकरी आपल्या विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरकडे निघाले. माऊलीच्या १९२ व्या आषाढी पायी वारी सोहळ्याचे शेलगाव, ता. खेड मध्ये वारकऱ्यांचे शेलगाव ग्रामस्थ व आंबी, तळेगाव दाभाडे येथील डॉ. डी. वाय. पाटील शेतकी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वतीने स्वागत करण्यात आले.
या महाविद्यालयाच्या कृषी कन्या निकिता घोडे, सनिका ढोणे, प्रेरणा इंगळे, तनुजा मल्लाव , पुजा सातपुते, विशाखा सानप, मेघना आर्यन यांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळशी वृंदावन हातात टाळ घेत तसेच शेलगावच्या गावकऱ्यांनी उत्साहाने सहभागी होवून स्वागत केले. वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कितन करून गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केले. या निमित्ताने गावकरी व कृषी कन्यांनी महाप्रसादाचे व फल आहाराचे आयोजन केले.
धन्य आज संत दर्शनाचा |
अनंत जन्मींचा शिण गेला ॥
मज वाटे त्यांशी अलिगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे ||





