कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
स्वराज्य स्थापनेत मराठा सरदारांचे योगदान अतुलनीय आहे. प्रत्येक मावळ्याचे बलिदानआपल्याला कदापीही विसरता येणार नसल्याचे प्रतिपादन केडगाव येथील सुभाष कुल महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. शोभा वाईकर यांनी केले.

तळेगांव ढमढेरे, (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगांव ढमढेरे येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत तृतीय पुष्प गुंफताना ” स्वराज्य स्थापनेत मराठा सरदारांचे योगदान” या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना डॉ. वाईकर बोलत होत्या.
याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाची तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला महाविद्यालयात सुरू आहे. त्या व्याख्यानमालेचेही आज तृतीय पुष्प ॲड. सीमा गोरे यांनी “गप्पांच्या गावी जगू आनंदाने” या विषयावर गुंफले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे, शकुंतला फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभा महेशबापू ढमढेरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. पराग चौधरी, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. दत्तात्रय वाबळे, बहिशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह डॉ. संभाजी शिंदे आदि यावेळी उपस्थीत होते. साहेबरावअण्णा शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
डॉ. वाईकर पुढे म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा आपण शिवरायांच्या स्वराज्याविषयी चर्चा करतो तेव्हा तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभा राहतो. शिवरायांना प्रतिकूल परिस्थितीत जीवावर उदार होऊन साथ देणारे मावळे आपल्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे डॉ. वाईकर म्हणाल्या. शौर्य, प्रेरणा, निष्ठा आणि स्वराज्य निर्मितीचा ध्यास आणि परकियांपासून स्वराज्य रक्षण हेच शिवकाळातील प्राधान्य असल्याचे डॉ. वाईकर यांनी सांगितले. आजच्या काळातही सदैव अखंडपणे शिवचरित्र आपल्याला प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. सीमा गोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आनंदी आणि सकारात्मक जीवनशैली आज आपल्या प्रत्येकाचीच आवश्यकता आहे. नैसर्गिक जगणेच आज आपण गमावतो आहोत. आज प्रत्येकजण ताण तणावात आहे. अशा परिस्थितीत आनंदी आणि संवादात्मक भूमिकेतून जीवनाकडे पाहणे गरजेचे असल्याचे ॲड. गोरे म्हणाल्या.
आत्मसंवाद हा सुद्धा व्यक्तिमत्व विकासाचाच भाग असून प्रत्येकाने यावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. युवकांनी निश्चित जीवनाचे ध्येय ठरवायला हवे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी शिवकाळातील आठवणींनी उजाळा दिला. धर्म आणि देश रक्षणासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांच्या कार्याची युवकांनी जाणीव ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी सातत्याने सदविचारांचा आग्रह धरायला हवा असा आग्रहही त्यांनी केला. आपल्या पालकांची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम करून जीवनाला आकार देणे गरजेचे असल्याचे डॉ . मुसमाडे यांनी सांगितले.
मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. पद्माकर गोरे, डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. अमेय काळे, डॉ. सुमेध गजबे, डॉ. विवेक खाबडे, डॉ. रवींद्र भगत, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रीती पवार, प्रा. विद्या टुले, प्रा. कांचन गायकवाड, प्रा.राहुल महाजन , प्रा. अविनाश नवले, प्रा. राम कराळे, प्रा.अश्विनी पवार, प्रा. आकाश मिसाळ, प्रा. कल्याणी ढमढेरे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. बहिशाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. संभाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. आकाश मिसाळ यांनी आभाप्रदर्शन केले.





