अजितदादांनी मरणाच्या दारातही हातातील घड्याळ सोडले नाही” – प्रदिपभाऊ कंद
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद (ता.हवेली): येथे “घड्याळाच्या काट्यावर चालणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज नियतीच्या काट्याने आमच्यातून हिरावून नेला.”अशा शब्दांत शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यासह लोणीकंद पंचक्रोशीत शोककळा पसरली असून,त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रदिपभाऊ वसंतराव कंद मित्र परिवार आयोजित शोकसभेत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकच टाहो फोडला.

पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रदीप वसंतराव कंद यांनी भावनिक होत अश्रुपूर्ण नयनांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की,”आज राजकारणातील आमचा ‘बाप’ आणि लाडक्या बहिणींचा भाऊ हरवला आहे. पुरुषाला सहजासहजी रडता येत नाही, पण जेव्हा कुटुंबातले दुःख असते तेव्हा डोळ्यांचा बांध फुटतो. आज माझी आणि माझ्या कुटुंबाचीही तीच अवस्था आहे. २८ फेब्रुवारीला माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि नेमक्या २८ जानेवारीला अजितदादा सोडून गेले, हे दुःख न सोसणारे आहे. दादांनी मरणाच्या दारातही हातातील घड्याळ सोडले नाही, ते शेवटच्या श्वासापर्यंत कामात मग्न राहिले.बारामतीच्या माळरानावर विखुरलेली कागदपत्रे त्यांच्या कामाची साक्ष देतात. आता आपणच ‘अजित दादा’ होऊन जनतेची कामे मार्गी लावायची आहेत.” यावेळी दादांच्या निधनामुळे प्रचार सभेंचे रूपांतर शोकसभेत झाले असून, प्रचाराच्या गाड्या आणि संवाद मेळावे शांत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

या शोक सभेत पेरणेचे माजी सरपंच अण्णासाहेब टुले, पिंपरी सांडसचे माजी सरपंच सतीश भोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साईनाथ वाळके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष जयेश कंद, पेरणेचे ज्येष्ठ नेते दादापाटील वाळके, पेरणेचे नेते शरद माने, लोणीकंदचे माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते श्रीमंत झुरूंगे, ज्येष्ठ नेते रविंद्र कंद, सोमनाथ तांबे आदींनी शोक सभेत दादांच्या कार्याला उजाळा देत दुःख व्यक्त करीत श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केली. मेणबत्त्यांच्या प्रकाशात दाटला दुःखाचा उमाळा याप्रमाणे श्रद्धांजली सभेनंतर लोणीकंदमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला.पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महिला भगिनी हातात मेणबत्त्या घेऊन पुढे चालत होत्या,तर त्यांच्या मागे दादांच्या आठवणीत व्याकुळ झालेला जनसमुदाय होता.सर्वत्र काळोख असताना केवळ मेणबत्त्यांच्या उजेडात दादांचा फोटो आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख स्पष्ट दिसत होते. तुळापूर फाट्यावर सामूहिक पसायदान म्हणून या श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता झाली.

तुळापूर,वढू बुद्रुक,कोरेगाव भीमा जयस्तंभाचा विकास व्हावा हा अजितदादांचा ध्यास होता : लोचन शिवले
लोणीकंद पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लोचन शिवले या प्रसंगी अत्यंत भावूक झाल्या होत्या.त्या म्हणाल्या की,”बारामती हा दादांचा जीव की प्राण होता, ‘नेहमी माझी बारामती’ म्हणणाऱ्या दादांनी अखेरचा श्वासही तेथेच घेतला.सकाळी लवकर कामाला सुरुवात करणारे अजित दादा म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला मोठा निधी देऊन स्मारक भव्यदिव्य व्हावे,तसेच तुळापूर, वढू बुद्रुक आणि कोरेगाव भीमा जयस्तंभाचा विकास व्हावा,हा त्यांचा ध्यास होता.घड्याळाची वेळ कधीही न चुकवणाऱ्या दादांची वेळ आज नियतीनेच चुकवली.पंधरा वर्षे पक्षाचे काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्तीला न्याय देण्यासाठी त्यांनी जाता-जाता पदरात उमेदवारी टाकली. दादा आमच्या कुटुंबाचा आधार होते.असे लोचन शिवले यांनी बोलताना सांगितले.





