नागपूर येथे भव्य सन्मान सोहळा संपन्न
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
समाजकार्याच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्यरत असलेल्या सणसवाडी, ता. शिरूर येथील सीमा पवार यांना ‘महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा देखणा व प्रेरणादायी पुरस्कार सोहळा विदर्भ हिंदी साहित्य सभागृह, हिंदी भवन, झाशी राणी चौक, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम विसावा सोशल फाउंडेशन, इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि समृद्धी प्रकाशन (खरात सर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यास सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, प्रसिद्ध उद्योजक राम रतनजी हाडगे (नागपूर), साहित्यिक मनीषा कांबळे (नागपूर), डॉ. संजय हर्षे (ब्रह्मपुरी), डॉ. रवींद्र दिगोरे (नागपूर) तसेच स्वाती तरडे, अध्यक्षा – विसावा फाउंडेशन (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सन २००८ पासून सीमाताई पवार यांचे समाजासाठीचे कार्य अखंड सुरू आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा सामाजिक कार्यात पाऊल ठेवले. चूल आणि मूल या मर्यादांपलीकडे जाऊन त्यांनी शिरूर पंचायत समिती अंतर्गत बचत गट प्रेमिका म्हणून काम पाहिले. पुढे महाराष्ट्र महिला विकास आर्थिक महामंडळ, चैतन्य संस्था (खेड), कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट (अमेरिका), जॉन डिअर, माहेर संस्था, पोलीस स्टेशन दक्षता समिती, शाळा व्यवस्थापन समिती अशा विविध संस्थांमधून महिलांसाठी व्यापक कार्य केले.
सीमाताईंनी महिलांचे संघटन करून अनेक बचत गटांची स्थापना केली व त्यांना व्यावसायिक दिशा दिली. भांडी धुण्याचे लिक्विड, फिनेल, द्रोण-पत्रावळी, मसाले, लोणची, पापड, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, केक, मेहंदी, रांगोळी, शेवया, बॅग, दप्तर, पर्स आदींचे प्रशिक्षण देत महिलांचा शाश्वत विकास साधला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

याचबरोबर घरगुती वाद-विवाद मिटवून अनेकांचे संसार मार्गी लावण्याचे कामही सीमाताई सातत्याने करत आहेत. मदतीसाठी येणाऱ्यांसाठी त्यांचा दरवाजा रात्रंदिवस उघडा असतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तसेच इतर राज्यांतूनही लोक त्यांच्या कडे मदतीसाठी येतात. अनेक प्रश्न त्या फोनवरून तर कधी प्रत्यक्ष जाऊन विनामोबदला सोडवतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, चहा-नाश्ता करून त्यांना पाठवणे ही त्यांची ओळख आहे.
गरज पडल्यास चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी सीमाताईंची ठाम ‘ताईगिरी’ही सर्वश्रुत आहे. मुंबई, दिल्लीसह राज्यभर झालेल्या आंदोलनांमध्ये, उपोषणांमध्ये व सामाजिक चळवळींतून त्या महाराष्ट्रभर परिचित झाल्या.
त्यांच्या या सर्व समाजोपयोगी कार्याची दखल घेत विविध संस्था व संघटनांनी यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्याच परंपरेत नागपूर येथे प्रदान करण्यात आलेला ‘महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार’ हा त्यांच्या कार्याचा गौरव ठरला आहे.
या पुरस्काराबद्दल सीमाताई पवार यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





