कोरेगाव भिमा : प्रतिनिधी
सणसवाडी – शिक्रापूर गटातील माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने आयोजित मोफत त्र्यंबकेश्वर-ज्योतिर्लिंग व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दर्शन यात्रेला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. तब्बल १३८ बसमधून ६५०० भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत भक्तिभावाने हा सोहळा यशस्वी केला.
शिक्रापूरच्या माजी उपसरपंच सुजाता खैरे, माजी उपसरपंच सागर सायकर, ओंकार कर्डिले, केतन खेडकर, प्रकाश गुळवे, ढेकळे साहेब, दत्तात्रय वाळवेकर, गंगाधर पठाडे, नवनाथ भुजबळ, विजय काळकुटे, गणेश सातपुते, राहुल काकडे, गणेश राऊत, चंद्रकांत वाबळे व इतर यांनी यात्रा संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तर अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.
कासारी, राऊतवाडी, वाबळेवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, वाडा पुनर्वसन आणि कोरेगाव भिमा परिसरातील भाविकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या यात्रेचे आयोजन कुसुम मांढरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने झाले. दर्शनस्थळी भोजन, पाणी, वैद्यकीय सेवा आणि विश्रांती यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांनी सांगितले की, “आम्ही आलो नाही, तर स्वामींनी कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून आम्हाला बोलावले.” या श्रद्धायुक्त शब्दांत भाविकांनी आपली भावना व्यक्त केली. अनेक महिला भक्तांनी कुसुम मांढरे यांच्यावर स्वामींची कृपा आहे, त्या खऱ्या अर्थाने जनसेवेचे माध्यम आहेत असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना कुसुम आबाराजे मांढरे म्हणाल्या, “ही केवळ यात्रा नव्हे, तर समाजात श्रद्धा, एकता आणि सेवाभाव जागवण्याचा प्रयत्न आहे. माझ्या माता-भगिनींना दिलेला दर्शनाचा शब्द पाळणे, हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
यात्रेदरम्यान “जय श्रीराम”, “श्री स्वामी समर्थ”, “हर हर महादेव” या घोषणांनी परिसर दुमदुमला. भजन, अभंग, गुरुचरित्र पठण, टाळ-मृदंगाच्या तालावर भाविकांचे नामस्मरण — या साऱ्यांनी वातावरण भक्तिमय बनले.
कुसुम मांढरे यांच्या या उपक्रमातून ग्रामीण भागात भक्ती व समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.





