कोंढवा बुद्रुक / प्रतिनिधी
बहुजनांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनीचं! काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या शाहू महाराजांनी सबंध समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले, आणि त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी धोरणे आखून अमलात आणली. त्यामुळेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे शैक्षणिक क्रांतीचे जनक असल्याचे परखड मत माऊली प्रतिष्ठान कोंढवा बु., पुणे चे संस्थापक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, हडपसर विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष श्री. संदीप बधे यांनी व्यक्त केले.
श्रीमती कलावती बधे कला व वाणिज्य महिला महाविद्यालय कोंढवा बु., पुणे यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी सोहळ्याच्या आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी माऊली प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अॅड. प्रिती बधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हर्षदकुमार मुंगे विचारमंचावर उपस्थित होते.

बधे पुढे म्हणाले की, मानसिक गुलामी दूर करायची असेल तर सर्वप्रथम अज्ञान दूर व्हायला हवे, हे शाहू महाराजांनी अचूक ओळखलेले होते. आणि हेच अज्ञान आणि अंधश्रद्धा तसेच गुलामीचे जोखड झुगारून देण्याचा एकच उपाय आणि तो म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच यासाठी महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि तसा आदेशच त्यांनी जारी केला की, सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण घ्यावेचं लागेल अन्यथा दंड ठोठावण्यात येईल. शाहू महाराज केवळ आदेश देऊन स्वस्थ बसले नाहीत, तर आपल्या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याची संपूर्ण माहिती नियमितपणे त्यांना मिळावी अशीही व्यवस्था केली. ह्यातून त्यांची सर्वसामान्य रयतेप्रती असलेली तळमळ दिसून येते व शाहू महाराजांना लोक रयतेचा राजा का म्हणत हे सुद्धा समजून येते, असेही ते म्हणाले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना प्रिती बधे म्हणाल्या की, पाल्यांना शिक्षण दिले नाही तर पालकांना दंड करणारा जगातला एकमेव राजा म्हणजेच शाहू महाराज होय. आणि यातूनच त्यांची शिक्षणविषयक दूरदृष्टी दिसून येते.
लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी निमित्त शंभर सेकंद एका जागेवर स्तब्ध उभे राहून या कार्यक्रमामध्ये अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार यांनी केले. सूत्रसंचालन स्वरांजली भालेराव तर आभार प्रा. हर्षदकुमार मुंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.





