प्रतिनिधी : विजयराव लोखंडे
हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भारत सोपानराव हरगुडे यांची बिनविरोध निवड होऊन गावाने पुन्हा एकदा एकसंघतेचा व सहकार्याचा आदर्श घालून दिला आहे. बिनविरोध निवडीची परंपरा जपत गावाने लोकशाही प्रक्रियेतील ऐक्य दाखवले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेली ही जागा ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढवळे यांच्या देखरेखी खाली व सरपंच धनंजय हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली भरली गेली. उपसरपंच पदासाठी केवळ भारत हरगुडे यांचाच अर्ज प्राप्त झाल्याने, त्यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली.

निवडी नंतर भारत हरगुडे यांच्या सन्मानार्थ गावात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण गावाने हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.
या वेळी केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, एस.पी. हरगुडे, तानाजी हरगुडे, सोपानराव हरगुडे, माजी उपसरपंच संतोष हरगुडे, कुबेर पतसंस्थेचे संस्थापक रमेश हरगुडे, व तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारत हरगुडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, माजी सरपंच, सदस्य, महिला प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बिनविरोध निवडीमुळे केसनंद गावाने सामंजस्यपूर्ण व शांततेच्या मार्गाने नेतृत्व निवडण्याची परंपरा यशस्वीपणे पुढे चालवली आहे.





