विविध उपक्रमांचे आयोजनातून अभिवादन
आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संचलित, ज्ञानवर्धिनी विद्यालय – चाकण, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व ज्यु.कॉलेज-चाकण, भामा इंग्लिश मीडिअम स्कूल-चाकण येथे संस्थेचे संस्थापक स्व. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा चतुर्थ स्मृतिदिन विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या वतीने मुठभर धान्य हा उपक्रम राबविण्यात येतो. संस्थेच्या तिन्ही प्रशालेने जमा केलेले धान्य मान्यवरांच्या हस्ते स्नेहवन अनाथ आश्रम-कोयाळी, कन्हेरसर येथील वृद्धाश्रम या ठिकाणी देण्यासाठी सुपूर्द करण्यात आले.
चाकण येथील प्रशालेत स्व. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे माध्य व ज्युनिअर कॉलेज चाकण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा चतुर्थ स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संत ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदी अध्यक्ष प्रकाश तात्या काळे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी सचिव अजित वडगावकर, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड अध्यक्ष अर्जुन मेदनकर, काका काळे, उद्योजक शामभाऊ राक्षे, स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका अध्यक्षा श्रीमती मनिषाताई सुरेशभाऊ गोरे, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे, मानव विकास कल्याण ट्रस्ट अध्यक्ष दत्ताभाऊ गोरे, गुलाबराव गोरे प्रतिष्ठान अध्यक्ष विकासभाऊ गोरे, संस्थेचे संचालक ओमकारभाऊ गोरे, अंकुशराव पवार, विष्णूभाऊ गोरे, ज्ञानेश्वर सातव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मनोहरबापू शेवकरी, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, प्राचार्या माधुरी गोरे, प्राचार्य सचिन आभाळे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करीत मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भामा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नम्रता शेटे व दत्तात्रय लिंभोरे यांनी भाऊंच्या कार्याची महती तसेच संस्थेचा वटवृक्ष कसा झाला यावर प्रकाश टाकला. भामा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाऊंच्या विविध सामाजिक कार्याची ओळख नाट्यरूपाने सर्वांना करून दिली व सर्वांची मने जिंकली. प्रशालेचे गुणवंत शिक्षक नितीन शिंदे यांचे सांस्कृतिक विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.मा.अर्चना माळी, नम्रता शेटे यांचे पि.पी.टी मध्ये असलेल्या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी संस्थेच्या वतीने मुठभर धान्य हा उपक्रम राबविण्यात येतो.स़स्थेच्या तिन्ही प्रशालेने जमा केलेले धान्य मान्यवरांच्या हस्ते स्नेहवन अनाथ आश्रम-कोयाळी,कन्हेरसर येथील वृद्धाश्रम या ठिकाणी देण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. संस्थेच्या तिन्ही प्रशालेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान बक्षीस देऊन संस्थेच्या वतीने करण्यात आला. कु.धंद्रे ईश्वरी, कु.वैभवी रोडे यांना गायनामध्ये तसेच तन्वी सोनवणे ज्ञानेश्वरी,संस्कृती यांचा देवीचा गोंधळ या गीतामध्ये क्रमांक आल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले. भाऊंचे कार्य,चरीत्र याविषयी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

ज्ञानवर्धिनी विद्यालयाचे आदर्श शिक्षक सुनिल वडेकर यांनी आपल्या वक्तृत्वातून भाऊंचा संघर्ष गोरगरीब, कामगार खेड्या पाड्यातील सर्व़च लोकांनी जवळून पाहिला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम हे खेड तालुक्यांमध्ये वाखाणण्या सारखे आहे असे सांगितले. प्रशालेचे गणित विषयाचे आदर्श शिक्षक सिद्धार्थ मळेवडी यांनी आदर्श शिक्षक कसा असावा याबद्दल भाऊंनी केलेले मार्गदर्शन अमुल्य आहे असे सांगितले. जे जे कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये भाऊंची उणीव भासते असे सांगितले. भामा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संपदा कदम यांनी आपल्या भाषणातुन भाऊ म्हणजे नवीन पिढीसाठी एक मार्गदर्शक एक आधारस्तंभ होते. शेवटच्या माणसापर्यंत आधार पोहोचवणे हा त्यांचा विचार होता.साधी राहणी व कठीण परिश्रम हे त्यांचे जीवनाचे ब्रीदवाक्य होते असे सांगितले. नितीन गोरे यांनी वक्तृत्वातून भाऊंच्या आठवणीला उजाळा दिला. राजकारणापेक्षा समाजकारणाला भाऊ महत्व देत होते.आरोग्य,समाजसेवा,शिक्षण इ. सर्वच क्षेत्रात भाऊंचा ठसा होता. भाऊंनी जे संस्कार दिले ते संस्कार आम्ही असेच पुढे चालवु असे आश्वासन त्यांनी उपस्थित सर्वांना दिले.ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी मनोगतातून व्यक्त केलेली समाजसेवेचा, राजकारण यांचा वारसा भाऊंनी खंबीरपणे चालवला.शिक्षण, राजकारण ,समाजकारण यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. शांत, नम्र या गुण वैशिष्ट्यावर समाज मनात भाऊंनी आपले वेगळे स्थान निर्माण केले असे सांगितले. ज्ञानेश्वर पाटील यांनी विविध प्रसंगाद्वारे भाऊंच्या आठवणीला उजाळा दिला व भाऊ अखंडपणे सर्वांच्या हृदयात राहतील असे सांगितले. अर्जुन मेदनकर यांनी भाऊंचे कार्य हे आदर्शवत होते व त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना दुःख झाले आहे कारण त्यांचे मार्गदर्शन अमुल्य होते असे सांगितले. प्रकाशतात्या काळे यांनी भाऊंच्या कार्याची महती गाताना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील ओवी सांगुन समाजासाठी ते जगले व कीर्ती रूपाने ते उरले व त्यांचे कार्य अजरामर आहे असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे यांनी आपल्या मनोगतातून भाऊंची आठवण सांगताना सांगितले की भाऊ आमच्यात नाहीत असे आम्हाला कधी वाटतच नाही. कोणतेही कार्य करताना फक्त शरीराने तिथे असून उपयोग नाही तिथे मनाने व हृदयाने असायला हवं असे भाऊ म्हणायचे आणि त्यांचे हे मार्गदर्शन आम्हा प्रेरणादायी आहे असे सांगितले. मुठभर धान्य या उपक्रमासाठी धान्य जमा केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अध्यक्षांनी कौतुक केले. सूत्रसंचालन लिंभोरे सर यांनी केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.





