गाजनन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथे व हमर रस्त्यालगत एसटीच्या बसेसना थांबा मंजूर नाही. त्यामुळे बाहेरगावचे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापाऱ्यासह सर्वही गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने थांबा मंजूर करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संदीप ढेरंगे यांनी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडे केली आहे.
कोरेगाव भिमा येथे २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या कागदोपत्री १३ हजार ११६ इतकी असली तरीही प्रत्यक्षात नोकरी-व्यवसायानिमित्ताने वास्तव्यास आलेल्यांची संख्या सुमारे ३० हजाराहून अधिक आहे. त्यातच पंचक्रोशीतील १२-१५ गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी आदींची ये-जा मध्यवर्ती असलेल्या कोरेगावातून सुरू असते. तसेच विदर्भ मराठवाड्यांतील अनेक कुटुंबे नोकरी व्यवसायानिमित्ताने या परिसरात स्थलांतरित झालेली आहेत. या सर्वांना एसटी बसमध्ये चढणे अथवा उतरण्यासाठी १० किलोमीटर अंतरावर वाघोली अथवा शिक्रापूरला जावे लागते. त्यामुळे जादा तिकीट दरासह अधिकच्या प्रवासाचा भुर्दंडही प्रवाशांना सोसावा लागतो. यात ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची मोठी कुचंबणा होते.

या ठिकाणी तातडीने थांबा मंजूर करावा, अशी लेखी मागणी सरपंच संदीप ढेरंगे यांनी राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, एसटीच्या शिवाजीनगर, स्वारगेट तसेच शिरूर आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.





