शिरूर : प्रतिनीधी
” आपली भाषा आपण जपली पाहिजे ” असे आवाहन शिरूरच्या मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी केले. मराठी साहित्य परिषद शिरूर शाखा व राज्य परिवहन महा मंडळाचे शिरूर बसस्थानक यांच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे, शिरूर आगार प्रमुख मनीषा गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूरचे अध्यक्ष नीलेश मोहनलाल खाबिया, उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष सी. पी. बोरा, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूरचे सदस्य ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारू, पत्रकार प्रवीण गायकवाड, नगरपालिका स्वच्छता अधिकारी डी. टी. बर्गे आदी उपस्थित होते.
मुख्याधिकारी काळे व आगार प्रमुख गायकवाड यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना काळे म्हणाल्या की, बोली भाषा असो अथवा प्रमाण भाषा असो प्रत्येक भाषेचे स्वंत:चे असे एक महत्व असते. जन्मला नंतर पहिला शब्द आपल्या मातृभाषेत उच्चारतो. मातृभाषेतून आकलन हे आपणास लवकर होते. आपली भाषा आपण जपली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यांचा आढावा घेत त्याच्या विशाखा काव्यसंग्रहातील साहित्यांबाबत त्यांनी माहिती दिली. त्याचे साहित्य वाचत आमची पिढी घडली. कुसुमग्रज यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात प्रा. सतीश धुमाळ म्हणाले की, आपल्या मातृभाषेचा गौरव आणि साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांच्या स्मुतीना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने सन २०१३ रोजी घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर यांचा वतीने वर्षभरात आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी स्वागत नीलेश खाबिया यांना केले. सूत्रसंचालन दीपक घारू यांनी केले तर आभार प्रवीण गायकवाड यांनी मानले.





