वाघोली सारख्या विकसनशील शहरात येऊन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणारे मनसेचे धडाकेबाज शिलेदार मा.श्री. प्रकाशजी जमधडे हे आता वयाची चाळीशी पार करताहेत. त्यांच्या साग्रसंगीत आयुष्याचा घेतलेला हा सर्वकंष आढावा..!

ऐन जोमात आलेली पिके आणि स्वप्ने जिथे डोळ्यांदेखत करपून जातात अशा दुष्काळी भागात यशाचे भरघोस पिक घेण्याची किमया साधणं म्हणजे येर्यागबाळ्याचे काम नव्हे..परंतु ही किमया साधलीय श्री. प्रकाश जमधडे यांनी..!!
गरीबी, नापिकी आणि प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीचे शिड उभारुन आपल्या यशाची नौका पैलतीरावर नेण्यासाठी प्रकाशजींनी जे काही कष्ट उपसले, त्याचेच हे यशावलोकन..!!
आज आपण त्यांना ड्रीम्स सोसायटीचे चेअरमन अथवा होतकरु उद्योजक तसेच राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालून जनसेवा करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखतो. पण ही ओळख मिळवणे सोपे नव्हते. त्यांच्या शालेय जीवनापासूनच संघर्ष त्यांची सावली बनून सोबतीला होता. पण कच खातील ते प्रकाशजी कसले..! परिस्थितीवर मात करण्यासाठी ते दोन पावले मागे आले. स्वतःच्या कुटूंबाची आर्थिक घडी बसवण्यासाठी नाईलाजास्तव बारावीतूनच शिक्षण सोडून त्यांनी औद्योगिक क्षेत्रात खाजगी नोकरी पत्करली. तीन वर्षे सतत शिक्षणापासून दूर राहत, आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी घराचा पाया मजबूत केला. यादरम्यान शिक्षणात बराच खंड पडला होता पण त्यांची शिकण्याची जिद्द काही कमी झालेली नव्हती. प्रकाशजींनी अतिशय खडतर परिस्थितीत शिकून मानसशास्त्र या विषयात पदवी मिळवली.

पदवी तर मिळाली पण नोकरीचे काय ? नोकरीसाठी ते वणवण भटकत राहिले पण प्रत्येक ठिकाणी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. संघर्ष काही पाठ सोडत नव्हता पण प्रकाशजींनी चिकाटी सोडली नव्हती. ज्यांचे नशिब दुष्काळात जन्माला आलेले असते त्यांना आपल्या आयुष्यात हिरवळ कशी जन्माला घालायची याचे पुरेपूर ज्ञान असते. प्रकाशजींनी हवेचा झोत ओळखून आपली पदवी पेटीत बंद केली अन् पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात सुमारे बारा वर्ष काम केले. हे काम करत असताना या क्षेत्रातील अनुभवाने त्यांनी आपला भाता ज्ञानबाणांनी भरुन घेतला. पुढे जाऊन त्यांनी ‘ ड्रीम होम सर्व्हिसेस ‘ नावाने स्वतःची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून ते केवळ पैसाच नाही कमवत तर ज्यांना स्वप्नातलं घर हव असत त्यांच्यासाठी ते घर योग्य दरात उपलब्ध करुन देतात.

वाघोलीमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी येथील समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला. शालेय जीवनापासूनच अंगी नेतृत्वगुण असल्याने ते राहत असलेल्या सोसायटीचे ते दोनवेळा बिनविरोध चेअरमन झाले. यादरम्यान कामकाजातील निःपक्षपातीपणा व पारदर्शकता पाहून सोसायटीच्या सदस्यांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नीने वाघोली ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवली. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रकाशजींनी स्वतः राजकारणात उडी घेतली. दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने त्यांना विधानसभा उपविभाग अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. त्या पदाला न्याय देत असतांना हिंदूजाणनायक आदरणीत राजसाहेब ठाकरे यांचे विचार ते तळा – गाळात पोहचवत आहेत आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मध्ये आपले योगदान देत आहेत.

या संधीचा पुरेपूर लाभ उठवत प्रकाशजींनी जनतेच्या विविध प्रश्नांवरुन रान उठवले. वाढीव वीजबील ,पथदिवे , रस्त्याच्या समस्या ,कोरोनाकाळात दवाखान्यांचे अवाजवी बील कमी करुन देणे , खाजगी शाळांमध्ये आकारली जाणारी मनमानी फी , स्थानिकांच्या नोकरीचा प्रश्न ,गँसदरवाढीबाबत आंदोलन, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, रस्त्यावरील खड्याविरोधात मोठे आंदोलन केले, मराठी पाट्या साठी आंदोलन अशी न संपणारी यादी आहे. यावरून लक्षात येते की प्रकाशजींना जनतेच्या समस्यांची किती जाणीव आहे. कोणत्याही आंदोलनात ते हिरीरीने भाग घेतात. जिथे जनतेवर अन्याय होतो तिथे प्रशासनाला जाब विचारुन ते जेरीस आणतात. सध्या जनतेचे कोणतेही काम धसास
लावण्याचे कसब केवळ प्रकाशजींकडेच आहे.

असे सजग आणि संवेदनशील असणारे प्रकाशजी वैयक्तिक आयुष्यात खूप समाधानाने राहतात. त्यांच्या दिलखुलास शैलीमुळे त्यांच्याभोवती मित्रांची, हितचिंतकांची कायम मांदियाळी असते. बोलण्यातील गोडवा आणि कुणालाही आपलसं करुन घेण्याचे कसब हे त्यांच्या स्वभावाचे विशेषगुण आहेत. त्यांना क्रिकेटचे भारी वेड आहे. शालेय जीवनात ते कबड्डी, खो-खो , क्रिकेट अशा विविध क्रिडाप्रकारांत उत्साहाने भाग घेत असत. वाचन, लेखन या साहित्य प्रकारातही त्यांना विशेष गती आहे. त्यांचे अभ्यासपूर्ण लेख वर्तमानपत्रात नियमित छापून येत असतात. मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली होती.

वाघोलीचा महानगरपालिकेत समावेश होऊन दोन वर्ष झाले आहे. जेवढा महसूल जातो ,त्याच्या एकपटही काम होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत वेळोवेळी आंदोलने करुनही नागरी समस्या जैसे थेचं आहेत. म्हणूनच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना योग्य न्याय देण्यासाठी प्रकाशजी मनसेमार्फत निवडणूक लढवणार आहेत. वाघोलीचा प्रथम नगरसेवक होऊन अनेक विकासकामे धसास लावण्याचा त्यांचा मानस आहे. वाघोली तिच्या प्रथम नगरसेवकपदाची माळ प्रकाशजींच्या गळ्यात घालते की अजून संघर्ष करायला लावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेलं..!!


©️लेखक
नामदेव सुखदेव गवळी





