२६ ऑक्टोबर पासून उपोषणास सुरुवात; पुढारी, नेत्यांना गावबंदीचा निर्णय
गजानन गव्हाणे पाटील
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली येथे गुरुवार (२६ ऑक्टोबर) पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक भागतील मराठा समाजाने साखळी उपोषण सुरु करावे असे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंतरवली सराटी येथे उपोषण सुरु आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सखल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

वाघोली गावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचे कार्यक्रम घेवू नये, राजकीय पुढारी, नेते यांना गावबंदी करण्यात आली असून मराठा समाजाने कोणत्याही कार्यक्रमास सहभागी होऊ नये तसेच वाघोली परिसरातील गावामधील नागरिकांना वाघोली येथे सुरु झालेल्या उपोषणामध्ये सहभागी होऊन पाठींबा द्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने केले जाणार असून आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे.





