शिरूर : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून शिरूर शहरातील नागरिक भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या समस्येने त्रस्त असून दोन दिवसापूर्वी गुजर कॉलनी परिसरातील एका चार वर्षांच्या मुलास कुत्र्याने चावा घेतल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला असून पालिका भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करणार कधी असा प्रश्न नागरिकान मधून विचारला जात आहे. दरम्यान येत्या पंधरा दिवसात कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी जाहीर केले आहे.
मागील काही वर्षापासून शिरूर शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला आहे. शहरातील हुडको कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, रेव्हन्यू कॉलनी, सैनिक वसाहत, पुणे नगर रस्त्या , पाबळ फाटा, कॉलेज रोड याखेरीज गावठाणातील विविध भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. रात्री व पहाटेच्या वेळी शहरातील विविध भागात ही कुत्री टोळक्याने फिरतात. एका वेळी १० हुन अधिक एकत्रित फिरणारे कुत्र्यानमुळे अनेकांच्या मनात भीतीने धडकी भरते. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, व दुचाकी वरून जणारे दुचाकीस्वार, पायी चालणारे पादचारी यांना याचा मोठ्या त्रास होतो. ही कुत्री अचानक अंगावर धावून येणे, दुचाकीस्वारांच्या पाठलाग करणे, जोर जोरात अंगावर धावून येवून भुंकणे, या सा-यांचा त्रास पहाटेच्या वेळी ट्युशन व शाळेसाठी घरा बाहेर पडणारे शाळकरी मुले, व्यायामासाठी बाहेर पडणारे व्यायामप्रेमी, कामासाठी बाहेर पडणारे व रात्री उशिरा परत घरी येणारे कामगार, याखेरीज नागरिकांना या भटक्या कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.

अनेक वेळ्या ही कुत्री पाठीमागे लागल्याने दुचाकीस्वार गाडीवरून पडून जखमी होण्याचे प्रकार ही घडले आहेत. लहान मुले ही कुत्रे मागे लागल्याने घाबरून पळत असताना पडून दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.
याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची खंत आहे. दिवसागणिक शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढता वावर लोकांची काळजी वाढविणारा आहे.

काही महिन्यापूर्वी शहरात एक नऊ वर्षीय मुलांचा ही कुत्र्या चावल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या विषय चर्चेला आला होता. दोन दिवसापूर्वी गुजर कॉलनीतील आयुष भास्कर हरिहर या चार वर्षाच्या मुलास भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
दरम्यान आयुष याला कुत्र्यांने चावा घेतल्याचा घटनेनंतर शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त होणार तरी कधी असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, अविनाश घोगरे, रवी लेंडे, डॉ. वैशाली साखरे, यांच्या सह अनिल डांगे, फिरोज सय्यद यांनी मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांची भेट घेवून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी त्याच्या कडे केली.

यावेळी सय्यद व बांडे म्हणाले की गेल्या अनेक महिन्यापासून शिरूरकर मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाने त्रस्त आहे. जिल्ह्यातील इतर नगरपालिका मध्ये कुत्र्यांचे निर्बीजीकरण करीता एजन्सी मिळू शकते . मग शिरूर मध्येच का मिळू शकत नाही. या संदर्भात तातडीने उपाययोजना करावी.
फिरोज सय्यद म्हणाले की, भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे हा महत्वाचा विषय असून याबाबत चालढकल करू नये.
दरम्यान यासंदर्भात बोलताना मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे म्हणाल्या की, या प्रश्नी प्रशासन गंभीर व संवेदनशील आहे. मी स्वंत: गुजर कॉलनी परीसराची पाहणी केली असून कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आयुष व त्याच्या परिवाराची भेट घेवून चौकशी केली आहे.
शिरूर नगरपरिषदेने शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासंदर्भात चार वेळ्या टेंडर काढले होते. पण कोणीच त्यास प्रतिसाद दिला नाही. आता पाचव्या वेळेस टेंडर काढले असून याबाबत तीन ते चार जणांनी प्रतिसाद दिला असून टेंडर प्रोसेस सुरु आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसात यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन निर्बीजीकरणास सुरुवात होईल. शहरांतील सार्वजनिक रुग्णालयात रेबीज संदर्भातील लशी उपलब्ध आहेत.





