कोथरूड : प्रतिनिधि
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक दिपकराज म्हस्के यांच्या हस्ते झाले. प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून आपले उज्वल भविष्य साकारले जाऊ शकते त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता आहे याविषयी मार्गदर्शन केले.

दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक लक्ष्मण म्हस्के व अध्यक्ष अर्चना म्हस्के यांच्या प्रयत्नातून प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले.
शैक्षणीक दृष्ट्या सजग विज्ञान ज्ञानाने प्रगत संस्कारक्षम युवा पिढी घडावी याकरिता स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी करणे, अद्यावत अभ्यासिका ऊभारणे समुपदेशन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. व्यसन हे अभ्यासाचे असावे, आत्ताच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयीची मानसिकता बघता त्यांचे भविष्य अंधारात आहे त्यात वाढता मोबाईलचा दुरुपयोग यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांसाठी अशा व्याख्यानाची आवश्यकता आहे त्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील असे मत अर्चना म्हस्के यांनी व्यक्त केले.

सत्यवान रेडकर कनिष्ठ अनुवाद अधिकारी व सीमा शुल्क अधिकारी भारत सरकार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व स्पर्धा परीक्षेतील संधी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा या संबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मामासाहेब मोहोळ या कॉलेजमधील व्याख्यान हे त्यांचे २१४ वे व्याख्यान झाले. काही लोक अन्नदान करतात, रक्तदान करतात पण मी शिक्षणदान करतो माझ्याकडे पैशांची नाही तर मनाची श्रीमंती आहे, जसे विद्यार्थ्यांचे जन्मदाते हे पालक असतात तसेच आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा विद्यार्थ्यांचे पालक असतात, कारण आम्ही सुद्धा त्यांच्या भविष्याचा विचार करतो आणि त्यामुळेच निशुल्क स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन गरजू विद्यार्थ्यांसाठी करतो, प्रेमाचे पुष्पगुच्छ स्विकारण्या पेक्षा सत्काराचे पुष्पगुच्छ आयुष्यात महत्त्वाचे आहेत. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पाहिजेत तो आनंद त्यांना मिळून द्या असे आव्हान त्यांनी केले.

तिमीरातुनी तेजाकडे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाला पुढे घेऊन जाण्याचा माणस त्यांनी व्यक्त केला, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांचेच नाही तर केंद्रीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक राज्यस्तरीय व केंद्रातील स्पर्धा परीक्षांचे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केले काही वर्षातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून शासकीय अधिकारी होण्याचा मानस विद्यार्थ्यांनी बोलुन दाखवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा मार्फत विविध तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्याविषयी लवकरच नियोजन केले जाईल याची ग्वाही दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी आदिनाथ पाठक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुख रूपाली शेंडकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुनिता डाकले, डॉ मेघना भोसले, प्रा लक्ष्मण उकिर्डे, प्रा संतोष मोरे, डॉ स्वाती शिंदे, प्रा तानाजी जाधव, प्रा. विद्या किरवे आणि इतर सहकारी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कीर्ती करंजावणे यांनी केले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल लोणारे हिने आभार प्रदर्शन केले.





