आमदार अशोक पवार यांनी शासनाचे वेधले लक्ष
गजानन गव्हाणे पाटील
वाघोलीची लोकसंख्या तीन लाखाहून अधिक असताना त्याठिकाणी पुरेसे पोलीस संख्याबळ उपलब्ध नाही तसेच पुणे-नगर महामार्गावर वाहतुक कोंडीच्या समस्येबाबत आमदार अशोक पवार यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या वाघोली ते शिरूर १८ पदरी रस्त्याचे काम लवकर व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने लक्ष घालण्याची मागणी केली.
मुंबई येथे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून चौथ्या दिवशी आमदार अशोक पवार यांनी २०२२-२३ च्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा करीत असताना शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आवाज उठविला. त्याचबरोबर वाघोलीत भेडसावणारी अपुऱ्या पोलीस बळाची तसेच वाहतूक कोंडीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले.

राज्यातील १ लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या, मात्र शहर नसलेल्या ठिकाणी पोलीस बळ किती असायला हवे याबाबत मार्गदर्शक तत्वे असायला हवीत. वाघोली, उरुळी कांचन या ठिकाणी लाखो नागरिक वास्तव्यास आहे. मात्र या ठिकाणी त्याप्रमाणात आवश्यक असणारे पुरेसे पोलीस बळ नसल्याचे आमदार पवार यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच वाढीव लोकसंख्या असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. पुरेसे पोलीस बळ नसल्याने वाहतूक कोंडी सोडवणे देखील कठीण होते.
हवेली तालुक्याची प्रचंड लोकसंख्या विचारात घेऊन जनहितार्थ सर्व सरकारी विभागातील अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. वाघोली ते शिरूर रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपूलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर आहे परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. काम त्वरीत सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पाठपुरावा करावा अशा मागण्या आमदार पवार यांनी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह शिरूर-हवेलीतील विविध प्रश्न मांडले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी वाढीव निधी मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. वढु बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू होऊन पूर्णत्वास नेणे गरजेचे असल्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी केली.





