हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
जय जिजाऊ – जय शिवराय, हर हर महादेव च्या जयघोषात हिरडस मावळ खोऱ्यातील निरा नदीच्या काठावर आणि कासारखिंड ला लागून असलेले छोटेशे वाठार गावात ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आगमन आणि विराजमान सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

२००७ सालापासून काही तरुणांनी एकत्र येत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे ठरवले आणि तेथूनच या शिवकार्याला छोटीशी सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पाहून जसे त्यांना एक एक मावळा मिळत गेला त्याप्रमाणेच या तरुणांचे शिवकार्य पाहून अनेक शिवभक्त हळूहळू या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. त्यामुळे मोठया प्रमाणात शिवकार्यास प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाले.
संपूर्ण गावातील शिवभक्तांनी मिळून एक शिवप्रतिष्ठान तरुण मंडळ या मंडळाची स्थापना केली. मग पुढे हळूहळू कार्यक्रमांचे नियोजन वाढत गेले. एक छोटीशी सुरुवात केलेली आणि त्याचे रूपांतर आता एका मोठ्या सणामध्ये होऊ लागले आहे. प्रत्येक वर्षी शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवरून मशाल घेऊन येत शिवजयंती उत्सव मोठया जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण गावातील लहान थोर मंडळी, महिला वर्ग यांच्यामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असते.

हे सर्व करत असताना आपण हिरडस मावळ खोऱ्यातील शिवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आहोत आणि ही आपल्या साठी एक गर्वाची बाब आहे हे लक्षात घेऊन शिवभक्तनांमध्ये आपल्या गावात महाराजांचे ऐतिहासिक असे काहीतरी असावे या दृष्टीने २०१४ साली उदयास आली ती म्हणजे शिवशिल्प उभारण्याची संकल्पना. सर्व तरुण शिवभक्तांचा उत्साह वाढत गेला आणि मग सुरू झाली शिवशिल्पाची तयारी. शिवभक्तांनी एकत्र येत आपापल्या अनेक संकल्पना व्यक्त केल्या सर्वांची या कार्याला सहमती होती.
शिवशिल्पाचे साधारण बजेट काढण्यात आले आणि मग सर्व शिवभक्तांनी आपापल्या परीने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली अधिक बिकट परिस्थिती असणाऱ्या शिवभक्ताने सुद्धा या कार्यासाठी सढळ हाताने मदत केली. २०१४ साली सुरू झालेल्या या कार्याला हळूहळू ओढ लागत गेली अशातच मधे कोरोनाचे संकट आले आणि कार्याला थोडा विलंब होत गेला, बजेट वाढत गेले, अनेक लहान मोठ्या अडचणी निर्माण झाल्या पण या सर्व अडचणींवर मात करत शिवभक्तांनी आपला केलेला संकल्प पूर्वत्वास नेण्याचा विडाच उचलला होता.

हे कार्य पूर्णत्वास नेण्यास गावातील तरुण युवकांचे मोलाचे योगदान आहे सर्व तरुण मंडळी ही एकत्र येऊन या कार्यासाठी काम करत आहेत. तरुणांच्या एकीचे बळ दाखवून देणारे उत्तम उदाहरण म्हणजे वाठार गावच्या चौकात उभे राहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवशिल्प.





